
मुंबई - रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दुसऱ्या स्थापना दिन सोहळ्याचे आयोजन १४ ते १९ एप्रिल २०२५ या कालावधीत नवी मुंबई - खारघर, पुणे, नागपूर, ठाणे या सर्व केंद्रांवर विविध उपक्रम आणि स्पर्धांच्या माध्यमातून केले जात आहे. त्याचा भव्य समारोप सोहळा १९ एप्रिल, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सेंट्रल हॉल, पहिला मजला, एल्फिस्टन टेक्निकल हायस्कूल, महानगरपालिका मार्ग येथे विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना ही राज्यात उच्च कौशल्य असलेले व रोजगारक्षम युवक निर्माण करण्याकरिता, रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याकरीता आणि उच्च दर्जाचे कौशल्य शिक्षण देण्यास, नवउद्योगास (स्टार्टअपस) नवसंशोधनास, रोजगार क्षमतेस, प्रशिक्षणास, समुपदेशनास, शिकाऊ उमेदवारीस, नौकरी कालीन प्रशिक्षणास चालना देण्यासाठी करण्यात आलेली आहे.
या कार्यक्रमात अखिल भारतील तांत्रिक शिक्षा परिषदचे अध्यक्ष टी. जी. सीताराम, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, विद्यापीठ अधिकार मंडळाचे सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी, कौशल्य विभागाचे अधिकारी, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment