
मुंबई - परभणीतील सोमनाथ सूर्यंवंशी, विजय वाकोडे यांचा मृत्यू तसेच दलितांवरील अत्याचाराच्या विरोधात परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला आहे. हा लाँग मार्च 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत दाखल होत आहे. या लाँगमार्चमध्ये मुंबईमधील नागरिकांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विविध सामाजिक संघटनांनी केले आहे. (Appeal to participate in the long march against atrocities on Dalits)
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्र अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन, दलित पेंथर सुवर्ण महोत्सव समन्वय समिती, नागरी अत्याचार विरोधी मंच, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सी पी आय (माले), लाल निशाण-लेनिनवादी राष्ट्रीय बहुजन संघ, संविधान संवर्धन समिती, भीम आर्मी आदी संघटनांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात कॉ. प्रकाश रेड्डी, सुबोध मोरे, शैलेंद्र कांबळे, संध्या गोखले, अशोक कांबळे, दादाराव पटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
परभणीतील सोमनाथ सूर्यंवंशी, विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला. या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तसेच घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर सरकारने अनेक आश्वासने दिली पण अजूनपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा नोंदविला नाही. शासनाच्या या दडपशाही व नाकर्तेपणाच्या निषेधार्थ परभणी आणि इतर मराठवाड्यातील दलित आणि पुरोगामी कार्यकर्ते न्याय हक्कासाठी १७ जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने मोर्चा घेवून निघाले आहेत. हा मोर्चा ठिकठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतरही कोणतीही भीती न बाळगता मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. हा मोर्चा मुंबईत अंदाजे १६-१७ फेब्रुवारीला पोचतील. या अन्यायाविरुद्ध मुंबईतील सर्व दलित आणि इतर पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन परभणीहून निघालेल्या मोर्चात सामील होऊन पाठींबा द्यावा असे आवाहन सामाजिक संघटनांनी केले आहे.
सर्व न्यायप्रेमी आणि संविधानाच्या बचावासाठी लढणाऱ्या कार्यकत्यांना पाठींबा देण्यासाठी, मुंबईतील विविध वस्त्यांमध्ये चौक सभा नाका सभा आयोजित करण्यात सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी पुढाकार घ्यावा तसेच लाँगमार्चच्या वाटेवर होणाऱ्या सभा कार्यक्रमात नागरिकांनी सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या पुरोगामी समतावादी, आंबेडकरी लेखक, कलावंत, साहित्यिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे आणि लॉगिमार्चचे समर्थन करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य मागण्या -
१. पोलिसांच्या अमानुष हिलेमुळे झालेल्या सोमनाथ आणि विजय वाकोडेच्या मृत्यूची खास चौकशी करून सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा लागू करून FIR नोंदवून त्वरीत निलंबन कारवाई झाली पाहिजे.
२. इतर अनेक स्त्री, पुरुष, मुले यांच्यावर जी हिंसा झाली, घरांची जी नासधूस केली त्याबद्दल पोलिसांवर कारवाई करावी आणि नुकसान भरपाई द्यावी. या सर्व जखमी व्यक्तींना संरक्षण दिले पाहिजे.
३. ही सर्व कारवाई पोलीस स्टेशन, रस्ते, जेल सर्व क्लोज सर्किट टीव्हीचे सीसीटीव्ही फुटेज पाहून ही तपासणी पारदर्शक स्वरूपात करावी.
४. अशाप्रकारे परत पोलीस कायदा हातात घेऊन लोकांवर अन्याय करणार नाहीत यासाठी कायम स्वरूपी सुधारणा करून, पोलिसांच्या अरेरावीवर नियंत्रण ठेवण्यास उपाययोजना करावी.
No comments:
Post a Comment