आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा आढावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 July 2024

आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा आढावा



मुंबई - महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई, ठाणे महानगरपालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त धर्मेंद्र शर्मा, वरिष्ठ निवडणूक उपायुक्त नितेश व्यास, निवडणूक उपायुक्त हिर्देशकुमार, वरिष्ठ प्रधान सचिव (मतदार यादी) एन.एन.बुटोलिया, महाराष्ट्राकरिता नियुक्त सचिव सुमनकुमार दास, सचिव (मतदार यादी) पवन दिवान तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे पोलिस आयुक्त, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या आढावा बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या सदस्यांसमोर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या सदस्यांद्वारा जिल्हाधिकाऱ्यांना यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाच्या कामकाजाबाबत सूचनाही केल्या.

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी उत्तुंग इमारतीमध्ये तसेच 200 पेक्षा जास्त घरे असलेल्या सहकारी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील मोठ्या शहरांतील उत्तुंग इमारती आणि समूह सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार याद्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात यावे, मतदार यादीतील नावे कमी करणे तसेच नवीन मतदार नावे समाविष्ट करणे यासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवावा, नवीन मतदान केंद्रे उभारणे, मतदार यादीत मतदार कार्डांची छपाई व वितरण त्याचबरोबर प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याच्याही सूचना भारत निवडणूक आयोगाकडून यावेळी करण्यात आल्या. आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळ, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन आदीबाबतही भारत निवडणूक आयोगाकडून माहिती घेण्यात आली.

या बैठकीनंतर भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार, डॉ.सुखबीर सिंग संधू यांनी सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad