नगर - भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसेच्या निषेधार्ध आंबेडकरी जनतेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बुधवारी बैठक झाली.भाजपा सरकारच्या काळात आंबेडकरी जनतेवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत आठवले यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिली पाहिजे, अशा प्रतिक्रिया काही तरुणांनी बैठकीत व्यक्त केल्या. आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आठवले यांनी आदर केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया आरपीआय (आठवले गट) प्रवक्ता अशोक गायकवाड यांनी दिली.
कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ विविध पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक नगर येथील विश्रामगृह येथे झाली. या बैठकीत भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यात आला. सर्वांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. जनतेचे हाल होऊ नयेत म्हणून बसवर दगडफेक करू नये, रास्ता रोको आंदोलन केले जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले. या घटनेचा निषेध करण्यासाठी दलित संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५ जानेवारी रोजी शुक्रवारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिस विनाकारण तरुणांची धरपकड करत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. त्यानंतर पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी आरपीआय (आठवले)चे प्रदेश सचिव व प्रवक्ता अशोक गायकवाड, माजी नगरसेवक अजय साळवे, अर्शद शेख, बन्सी सातपुते, सुनील क्षेत्रे, संजय खामकर, जयंत गायकवाड, संजय कांबळे यांनी चर्चा केली. विनाकारण तरुणांवर गुन्हे दाखल करू नयेत, दलित वस्त्यांमध्ये पोलिसांनी घुसू नये, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली.