मुंबई । प्रतिनिधी - मुंबई शहराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महापालिकेवर आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात मुंबई शहर मागे पडले आहे. यामुळे मुंबईचा क्रमांक वर यावा म्हणून पालिका कामाला लागली आहे. त्यासाठी पालिकेने स्वच्छ भारत अभियांनातर्गत ‘स्वच्छता ऍप’ डाऊनलोड करावे असे आवाहन केले आहे. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून ५० हजार नागरिकांनी हे ‘स्वच्छता ऍप’ आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केला आहे. तसेच आतापर्यंत या ऍपव्दारे २७ हजार तक्रारीचे निवारण करण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.
GOOGLE PLAY STORE / APPLE APP STORE वरुन “Swachhata-MoHUA App” ‘स्वच्छता ऍप’ डाऊनलोड झाल्यानंतर नागरिकांना ज्या-ज्या ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास तेथील फोटो काढून महापालिकेकडे ऍप द्वारे पाठविल्यास पालिकेकडून १२ तासाच्या आत स्वच्छतेबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. ‘स्वच्छता ऍप’ डाऊनलोड करावे असे आवाहन करण्यासाठी महापालिकेने नागरिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रबोधन करण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांचा वापर केलेला आहे. या मध्ये दुरचित्रवाहिनीव्दारे सुप्रसिद्ध कलाकार श्रुती मराठे व गौरव घाटणेकर यांनी ‘स्वच्छता ऍप’ नागरिकांनी डाऊनलोड करण्याच्या बाबतीत आवाहन केले आहे. तसेच रेल्वे-स्टेशन, बस थांबा विविध मॉल या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पथनाटय़ाद्वारे स्वच्छतेबाबत मुंबईकर नागरिकांमध्ये प्रबोधन करीत आहेत. तसेच या प्रबोधन कामासाठी आस्था महिलाबचत गटाव्दारे शहरातील विविध पर्यटन व गर्दीच्या ठिकाणी मोठयाप्रमाणात स्वच्छता रथ व पथ नाटयाव्दारे स्वच्छतेबाबत प्रबोधन केले जात आहे. त्याचबरोबर शहरातील महाविदयालय, शाळा आदी ठिकाणी स्वच्छता ऍप बाबत माहिती दिली जात आहे, महापालिकेच्या सर्व विभाग/खाते यांच्या मध्ये स्वच्छता ऍप विषय माहिती देण्यासाठी अधिकारी वर्गाचा एकसंच नियुक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर वस्ती पातळीवरील स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक संस्था याविषयी जनजागृती करीत असल्याचे पालिकेने कळविले आहे.