तूर खरेदी केंद्रांवर दोन दिवसांत बारदाना उपलब्ध होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 April 2017

तूर खरेदी केंद्रांवर दोन दिवसांत बारदाना उपलब्ध होणार

मुंबई, दि. 5 : राज्यातील तूर खरेदी केंद्रांवर दोन दिवसांत बारदाना उपलब्ध होणार आहे. नाफेडमार्फत सध्या 9 लाख 20 हजार बारदाना खरेदी करण्यात आला आहे. खरेदी केंद्रांवरील तूरीची त्वरीत उचल करावी. तोपर्यंत नव्याने तूर खरेदीची प्रक्रिया स्थगित ठेवावी. खरेदी केंद्रांवरील संपूर्ण तूरीची उचल झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरु करावी. शेतकरी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदीची मर्यादा वाढवून देण्यासंदर्भात केंद्र शासनाने सकारात्मकता दाखविली आहे, असे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे सांगितले. मंत्रालयात कृषीमंत्र्यांच्या दालनात राज्यातील तूर खरेदीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.

राज्यातील तूर खरेदीचा फुंडकर व देशमुख यांनी आढावा घेऊन बारदाना अभावी ज्या ज्या ठिकाणी खरेदी केंद्र बंद आहे ते तातडीने सुरु करावे, असे निर्देश नाफेड, अन्न महामंडळ, विदर्भ सहकारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी कृषीमंत्री फुंडकर यांनी दूरध्वनीवरुन केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्याशी संपर्क साधून तूर खरेदी केंद्रावर येत असलेल्या अडचणीबाबत माहिती दिली. जोपर्यंत संपूर्ण तूर खरेदी केली जात नाही तोपर्यंत केंद्र सुरुच राहतील, असे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी यावेळी सांगितले. फुंडकर यांनी यावेळी केंद्रीय कृषीमंत्र्यांना शेतकरी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदीची असलेली मर्यादा वाढवून देण्याबाबत विनंती केली.

राज्यात सध्या नाफेडमार्फत 9 लाख 20 हजार बारदाना खरेदी केला असून ज्या ठिकाणी बारदानाअभावी केंद्र बंद आहे ती येत्या दोन दिवसांत पुन्हा सुरु होतील. असे सांगून फुंडकर यावेळी म्हणाले की, विदर्भातील तूरीची खरेदी केंद्रे पूर्णपणे कार्यान्वित झाली पाहिजे. जे जुने केंद्र बारदानांअभावी बंद आहे ते पुन्हा सुरु करा. राज्यात 31 लाख क्विंटल तूरीची खरेदी झाली आहे. ती गेल्या 15 वर्षांतील विक्रमी असल्याचे श्री. फुंडकर यांनी सांगितले. सध्या खरेदी केंद्रांवर तूरीचा साठा शिल्लक आहे. त्याची उचल त्वरीत करावी. ही उचल होईपर्यंत नव्याने तूर खरेदी काही काळाकरिता स्थगित ठेवून खरेदी केंद्रांवरील तूर पूर्णपणे उचलल्यानंतर नव्याने खरेदीची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.

सहकार मंत्री देशमुख म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याची तूर या केंद्रांवर खरेदी झाली पाहिजे. तूर खरेदी संदर्भात नाफेड, एफसीआय, विदर्भ सहकारी महामंडळ या तिघांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. तूर खरेदीचा कालबध्द कार्यक्रम ठेवावा. आवश्यकता भासल्यास स्थानिक बाजारपेठेतून बारदानांची उपलब्धता खरेदी केंद्रांसाठी करुन द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad