भारिप, रिपब्लिकन सेना व डाव्यांची आघाडी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 January 2017

demo-image

भारिप, रिपब्लिकन सेना व डाव्यांची आघाडी

bharip+rip+sena+thired+frount+
मुंबई : नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघ, आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना व डावे यांनी आघाडी केली आहे. विशेष म्हणजे काँंग्रेसमधील नाराज १६ कार्यकर्ते भारिपमधून निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत माहिती आहे. येत्या २६ जानेवारीनंतर सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 

बौद्ध, मागासवर्गीयांच्या मतांसाठी सर्वच पक्ष गटातटातल्या नेत्यांना युती, आघाडीकडे खेचण्याच्या प्रयत्नात असतात. त्यानुसार रामदास आठवले यांचा रिपाइं आधीच भाजपासोबत आहे. काँग्रेसने जोगेंद्र कवाडे यांच्या गटाला काही जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. गवई यांचा गट कोणासोबत जाणार, हे अद्यापि निश्‍चित नाही. यात प्रकाश आंबेडकर यांचा भारिप-बहुजन महासंघ व आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांनी मात्र कोणत्याही पक्षाची प्रतीक्षा न करता डाव्यांना सोबत घेऊन आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारिप-बहुजन महासंघासोबत जाताना रिपब्लिकन सेनेने ७0 जागा मागितल्या आहेत. यातील ६0 जागा देण्याची भारिपने तयारी दर्शवली आहे. तसेच डाव्यांना ५0 जागा व स्वत: भारिप १२0 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. कोणत्या ठिकाणी कोणाला जागा द्यायच्या याबाबत २६ जानेवारीपर्यंत निर्णय घेऊन २२७ जागांची यादी जाहीर केली जाणार असल्याचे भारिप-बहुजन महासंघाचे प्रवक्ते महेश भारतीय यांनी सांगितले.

निवडणुकीत आतापर्यंत बौद्ध, मागासवर्गीय नेत्यांनी महायुती किंवा आघाडीसोबत राहून निवडणूक लढवली. याचा मोठा फायदा युती-आघाडीलाच झाला आहे. २0१२च्या पालिका निवडणुकीत आठवले गटाचा एक, प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाचा एक व युथ रिपब्लिकन एक असे तीन नगरसेवक निवडून आले. नेत्यानी गटातटातल्या राजकारणासाठी युती-आघाडीसोबत फरफटतच राहण्याची परंपरा कायम ठेवली असताना प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाने समविचारी पक्षांना सोबत घेऊन जायचा निर्णय घेतला आहे. आनंदराज व प्रकाश आंबेडकर तसेच डावे एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याने बौद्ध मागासवर्गीयांची मते या आघाडीकडे वळून नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे. 

काँंग्रेसचे १६ नाराज कार्यकर्ते भारिपमधून लढणार
मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या १६ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये तिकीट मिळणार नाही, हे नक्की झाल्यावर भारिपमधून निवडणूक रिंगणात उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्ये मुलाखती दिल्यानंतर तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने शिवाय काँंग्रेसमधील गटातटातल्या राजकारणात तिकिटाची प्रतीक्षा करत राहण्यापेक्षा भारिपमधून उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय शिवसेनेमधील २, भाजपामधील १ आणि काँग्रेसमधील १६ कार्यकर्ते अशा १९ जणांचा समावेश असून त्यांना भारिप-बहुजन महासंघातर्फे उमेदवारी दिली जाणार आहे. हे सर्व भांडुप, विक्रोळी, कांदिवली या विभागातील कार्यकर्ते आहेत.

Post Bottom Ad

Pages