शिवाजी महाराजांनी आखून दिलेल्या तत्त्वांनुसारच राज्याचे प्रशासन यापुढेही चालविणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 December 2016

शिवाजी महाराजांनी आखून दिलेल्या तत्त्वांनुसारच राज्याचे प्रशासन यापुढेही चालविणार - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 23 : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखून दिलेल्या नियमांनुसार आणि रयतेचे राज्य या परिपाठाच्या आधारावर सेवकाच्या भूमिकेत राहूनच यापुढेही शासनाचा कारभार चालवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या जलपूजन व भूमिपूजन समारंभासाठी आणण्यात आलेले राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख गड-किल्ल्यांची माती व नद्यांचे जल कलश स्वीकारण्याचा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडिया येथे संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशातील जनतेने पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती उद्या साकार होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जलपूजन व भूमिपूजनासाठी आणण्यात आलेली माती व जल यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐक्य जपले जाणार आहे. शिव छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन निवडणूकीला सामोरे गेलो आणि त्यांच्या आशिर्वादानेच महाराजांचा सेवक म्हणून सत्तेची सूत्रे हाती घेतली. महाराजांनी राजकारण आणि प्रशासन कसे असावे याचा परिपाक घालून दिलेला असून या तत्त्वानुसारच रयतेच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराजांनी आपल्याला अस्मिता आणि जगण्याचा अधिकार दिला. त्यामुळेच आपण स्वदेश आणि स्वधर्म जिवंत ठेवू शकलो. जगभरातील लोक केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बघण्यासाठीच भारतात येतील असे भव्य स्मारक उभारण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील सर्वच गड-किल्ल्यांचे संवर्धनाचे काम राज्य शासनामार्फत सुरु असून यासाठी संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या मार्फत गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. या समितीच्या मार्फत रायगडाचे काम सुरु असून शिवनेरीच्या कामाला गती देण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याने या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ उद्या त्यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या समारंभासाठी तमाम शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी राज्यभरातील 36 जिल्ह्यांतून प्रमुख गड-किल्ल्यांची माती व नद्यांचे जलाचे प्रत्येकी दोन याप्रमाणे 72 कलश त्या त्या जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. हे जल व मातीचे कलश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाच्या निश्चित स्थळी या कलशातील माती व पाणीच्या सहाय्याने स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या निमित्ताने अवघी मुंबई शिवमय झाली असून त्यांचा इतिहास जपण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सुरुवातीस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे, महाराष्ट्राची लोकधारा आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार रावसाहेब दानवे, आमदार राज पुरोहित, ॲड आशिष शेलार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार ॲड. आशिष शेलार व संजय भुस्कुटे यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना नितिन देसाई यांची होती. यावेळी स्मारकाच्या वैशिष्ट्यांची चित्रफित दाखविण्यात आली.

Post Bottom Ad