मुंबई ( प्रतिनिधी ) - विधानसभा निवडणुकीत मुंबईत खाते उघडून ब-यापैकी मते घेणा-या एमआयएमने महापालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईतील २२७ पैकी २० पेक्षा अधिक जागांवर एमआयएमचे उमेदवार हमखास निवडून येतील अशा पध्दतीने नियोजन असून पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. निवडणुकीत किती जागा लढवणार हे अजून निश्चित झालेले नाही. पण एमआयएम संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत भायखळा व औरंगाबाद येथून एमआयएमचे दोन आमदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर, औरंगाबाद आणि कल्याण डेांबिवली महापालिका निवडणुका पार पडल्या. औरंगाबादमध्ये एमआयएमचे २५ नगरसेवक निवडून आल्यानंतर राजकारण्यांच्या भूवया उंचावल्या. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत एमआयएमने सात उमेदवार रिंगणात उतरविले होते त्यापैकी दोन नगरसेवक निवडून आले.पक्षाला मिळणा-या यशामुळे एमआयएमचे आव्हाण मुंबई महापालिकेतही असणार आहे. मुंबईत एमआयएमचा एक आमदार निवडून आल्याने,मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमने मुंबई शहरात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे, असेही वारिस पठाण यांनी सांगितले.