मुंबई / अजेयकुमार जाधव
केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने भारतीय जवानांच्या सहाय्याने नुकताच सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानमधील आतंकवादी तळ नेस्तनाबूत केले. सर्जिकल स्ट्राईकची वाहवा सर्वत्र करण्यात आली. खुद्द भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची वाहवा करत अभिनंदन केले. संपूर्ण जगाचे लक्ष सर्जिकल स्ट्राईककडे लागले असताना मुंबईमध्ये मात्र भाजपाने आपल्या मित्र पक्ष शिवसेनेसह विरोधी पक्षांचे सर्जिकल स्ट्राईक केल्याची चर्चा आहे. भाजपाच्या एका बड्या नेत्यानेही पत्रकारांशी ऑफ द रेकॉर्ड बोलताना आम्ही मित्र व विरोधी पक्षातील नगरसेवकांची चांगलीच सोय करून ठेवली आहे अश्या केलेल्या वक्तव्यावरून या सर्जिकल स्ट्राईकला दुजोरा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रवारी २०१७ मध्ये होत असताना या निवडणूकीच्या माध्यमातून भाजपाने आपल्या पक्षाचा महापौर बसवण्यासाठी कंबर कसली आहे. केंद्र आणि राज्यामध्ये भाजपचे सरकार आल्यावर भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर आपली एक हाती सत्ता स्थापन करण्याच्या भाजपा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपाने पालिकेमध्ये झालेल्या घोटाळ्याला एकटी शिवसेना जबाबदार असल्याचे चित्र निर्माण करून सेनेला कोंडीत पकडण्यात भाजपाला यश आले आहे. निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असताना सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून मित्रपक्ष शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसच्या नगरसेवकांना घरी बसवण्याचा किंवा आपला प्रभाग सोडून इतर प्रभागांमधून निवडणूक लढवण्याची वेळ आणली आहे. यासाठी भाजपा सरकारने पाठवलेले पालिका आयुक्त आणि त्यांच्या हाताखालील पालिकेतील निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वापर झाल्याचीही चर्चा आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नुकतीच नव्याने प्रभाग रचना करण्यात आली. अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभागांची रचना करताना शिवसेना व काँग्रेसला चांगलाच धक्का देण्यात आला आहे. शिवसेनेच्या १३, काँग्रेसच्या १०, मनसेच्या ३, समाजवादी पक्षाच्या २, भाजपाच्या २ तर भारिप बहुजन महासंघाच्या एका नगरसेवकाच्या प्रभागांची फेररचना करून जे नवे प्रभाग तयार झाले त्यामधून अनुसूचित जातीसाठी १५ प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. अनुसूचित जातीमधील भारिपचे अरुण कांबळे व विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर वगळता शिवसेना, काँग्रेस व इतर पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांना ते ज्या विभागातून आधी निवडणूक लढले होते त्या प्रभागामधून निवडणूक लढता येणार नाही किंवा त्यांना इतर मतदार संघातून निवडणूक लढवावी लागणार आहे. यामुळे निवडणुकीआधीच राज्यात आणि केंद्रात सत्तेत असल्याचा फायदा उचलत मित्रपक्ष आणि विरोधी पक्ष यांचे सर्जिकल स्ट्राईक करण्यात भाजपा यशस्वी ठरल्याचे चर्चा राजकीय क्षेत्रात आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव १५ प्रभाग २२५,२१०,२००,१७३,१९५,१९८,१८८,९३,१६९,१४२,१३९,१५२,१५४,१५५,२६
सर्जिकल स्ट्राईकचा फटका कोणाला ?
शिवसेना - महापौर स्नेहल आंबेकर, राहुल शेवाळे, किशोरी पेडणेकर, अनुराधा पेडणेकर, यामिनी जाधव, गणेश सानप, सुप्रदा फातर्फेकर, अनिल निंबाळकर, दर्शना शिंदे, प्रणिती वाघधरे, संजना मुणगेकर, दिनेश पांचाळ, दिपक भुतकर
काँग्रेस - सुनील मोरे, पल्लवी मुणगेकर, अजंता यादव, सागर ठाकूर, ललिता यादव, सिमा माहुलकर, सुषमा शेखर, वकील शेख, फय्याज खान, मनोज जामसुदकर
मनसे - सीमा शिवलकर, हेमलता वांगे, समिता नाईक
समाजवादी पार्टी - रेश्मा नेवरेकर, ज्योत्स्ना परमार
भाजपा - महादेव शिवगण, राजश्री पालंडे
भारिप - अरुण कांबळे