मराठा आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक ‘मातोश्री’वर उभारणे संयुक्तिक
मुंबई, दि. 14 सप्टेंबर 2016:राज्यभरात ठिकठिकाणी होणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनांमुळे हादरलेल्या काही मंडळींनी दलीत समाजाला चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात केलेल्या विधानाला त्यांनी सहमती दर्शवत हे मोर्चे कोणत्याही पक्षाच्या किंवा दलित समाजाच्या विरोधात नाहीत. परंतु, मराठा समाजाच्या आंदोलनाला जातीय रंग देऊन त्याविरोधात दलित समाजाचे प्रतिमोर्चे काढण्याचे कारस्थान रचले जात आहे. मराठा समाजाच्या मोर्चांबाबत गैरसमज निर्माण करून दलित समाजाला फूस देण्याचे उद्योग नेमक्या कोणाच्या आदेशावरून सुरू आहेत? असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
राज्यभरात ठिकठिकाणी होणाऱ्या मराठा समाजाच्या शांततापूर्ण आंदोलनांमध्ये मुख्यमंत्री फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
विखे पाटील यांनी मराठा समाजाच्या मोर्चांबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि हेतूवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, राज्यभरात ठिकठिकाणी निघालेले मराठा समाजाचे मोर्चे ही समाजातील सर्वसामान्य नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या मोर्चामध्ये सहभागी सामाजिक संघटनांसोबत चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु, मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरलेल्या संघटनांना बाजूला ठेवून केवळ भाजप नेत्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनामध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्न केला आहे.
या मोर्चांचे नेतृत्व कोणताही नेता नव्हे तर समाजातील सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. या शांततापूर्ण विराट मोर्चांच्या माध्यमातून मराठा समाजाने आरक्षणासह आपल्या काही मागण्या मांडल्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल असते तर त्यांनी मोर्चामध्ये सहभागी संघटनांना चर्चेसाठी बोलावले असते. एकिकडे मराठा नेत्यांशी चर्चेची भाषा करायची आणि दुसरीकडे केवळ भाजपच्या नेत्यांची बैठक घेऊन त्याची भाजप प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमातून प्रसिद्धी करायची, हा मराठा समाजातील एकजुटीला गालबोट लावण्याचा प्रयत्न असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. येत्या 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर येथे नियोजित मोर्चात आपण सहभागी होणार असल्याचेही विखे पाटील यांनी जाहीर केले.
बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर निवासस्थानी उभारण्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले की, हे स्मारक कुठे उभारावे, याचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. परंतु, नेत्यांची स्मारके ही साधारणतः त्यांच्या निवासस्थानी किंवा आयुष्याशी जुळलेल्या वास्तुंमध्ये उभारली जातात. त्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक त्यांचे निवासस्थान राहिलेल्या आणि शिवसेनेच्या प्रवासात महत्वाचे स्थान असलेल्या मातोश्री इमारतीत उभारणे संयुक्तिक होते. हे स्मारक महापौर निवासस्थानी उभारण्याचे काहीच औचित्य असू शकत नाही.