मुंबई : अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा अशी मागणी मराठा समाजाच्या मोर्चांमधून कुठेही समोर आलेली नाही. पण या कायद्याचा गैरवापर होऊ नये, अशी सर्वांची भूमिका असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ग्रामीण भागातील राजकारणात अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत आहे, त्यामुळे लोकांच्या मनात राग आहे. हा कायदा रद्द करावा असे आमचे मत नाही; पण गुन्हा नोंदवताना या कायद्याचा गैरवापर केला जाऊ नये हा लोकांचा आग्रह असल्याचे चव्हाण म्हणाले. मराठा समाजात पसरलेला हा असंतोष गेल्या १५ वर्षांतील आहे की, सत्तेची दोन वर्षे पूर्ण करत असलेल्या भाजपा-शिवसेना सरकारच्या विरोधात आहे, असे विचारले असता खा. चव्हाण म्हणाले, लोक नाराज आहेत. कोणाच्या काळातला हा असंतोष आहे हा विषय येथे नाही. आम्ही जे काही केले त्याचा परिणाम म्हणून आज आम्ही विरोधात आहोत; पण या सरकारने काहीच केलेले नाही हा रागही आहेच, असे खा. चव्हाण म्हणाले.