मुंबई 23 Aug 2016 : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी तात्पुरती आणि कायमस्वरुपी जागा उपलब्ध करण्याबाबत त्वरित कार्यवाही सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
या विद्यापीठाकरिता तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परेदशी, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ‘एमएमआरडीए’चे आयुक्त यु.पी.एस.मदान, नगरविकास-1 विभागाचे प्रधान सचिव डॉ.नितीन करीर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, मुख्यमंत्र्याचे सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, मुंबई जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, विधी व न्याय विभागाचे जमादार, एनआयएसएमचे पदाधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अधिकारी,आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत 27 जून 2014 रोजी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सध्या तात्पुरत्या स्वरुपात टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस येथे सुरु आहे. मात्र ही मुदत पुढील शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून संपुष्टात येणार आहे. तसेच, कायमस्वरुपी जागा प्रत्यक्ष उपलब्ध होऊन त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी कालावधी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे.
सदर विद्यापीठ तात्पुरत्या स्वरुपात पवई येथील महानगर टेलिफोन संचार लिमिटेड येथील जागेत किंवा न्युझीलंड होस्टेल येथे सुरु करता येईल का, याबाबत चाचपणी करावी. तसेच विद्यापीठासाठी गोराई येथील उपलब्ध झालेल्या जागेचे सर्वेक्षण करुन प्रत्यक्ष ताबा मुंबई विधी विद्यापीठाला देण्याची कार्यवाही कोकण आयुक्त आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी घेण्याची कार्यवाही तत्काळ सुरु करण्याचे आदेश फडणवीस यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment