मुंबई, दि. 19 : सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण ठरविण्यात येत असून, त्याचे प्रारुप तयार करण्यात आले आहे. त्याअंतर्गत दर्जेदार शिक्षणासाठी अध्यापनात विविध प्रयोग करण्यात येत आहेत. देशातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण या बाबीस केंद्र शासनाकडून सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे सांगितले.
परिस्थितीशी निकराने लढा देत दहावी परीक्षेत यशाची पताका फडकावणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्र टाइम्स हेल्पलाईन’द्वारा वाचकांनी दिलेली मदत प्रत्यक्ष सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आज सकाळी माटुंगा येथील रुईया कॉलेज सभागृहात झाला, त्यावेळी जावडेकर बोलत होते. कार्यक्रमास शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक अशोक पानवलकर, निवासी संपादक श्रीकांत बोजेवार, रुईया कॉलेजचे प्राचार्य सुहास पेडणेकर आदी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले की, प्राथमिक शाळा ते आयआयटीपर्यंत शिक्षण देणा-या देशभरातील संस्थांमध्ये जवळपास 20 लाख शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा चांगला शिक्षक बनण्याकडेही कल असावा. यासंदर्भातही नवा आराखडा तयार करण्यात आला असून याबाबत विविध स्तरावरील मान्यवरांची मते मागविली जात आहेत. आज शिक्षणामध्ये विविध प्रयोग होण्याची आवश्यकता असून सगळ्यांनाच चांगले शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न होत आहेत.
समाजात परिवर्तन घडविण्याची ताकद केवळ शिक्षणात आहे. आपल्याकडे असलेल्या बुध्दीच्या जोरावर आणि मिळालेल्या संधीमुळे कोण कधी कोणती उंची गाठेल याचा आपण विचारही करु शकत नाही. आजही परिस्थितीशी निकराने लढा देत आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना जेव्हा मी पाहतो तेव्हा त्या मुलांबद्दल आदर आणि आपुलकी वाटते. आजही जी मुले रात्र शाळेत शिकतात त्यांच्यात असलेली जिद्द आणि चिकाटी त्यांना चांगले शिक्षण घेण्याची आणि काहीतरी करण्याची ऊर्मी देते, असेही जावडेकर यांनी सांगितले.
आपण आमदार असताना विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु केल्या व आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री झाल्यावर नवी दिल्लीत झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांचा सत्कार केला, असे सांगून जावडेकर म्हणाले की, सामान्य परिस्थिती असतानाही विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश अभूतपूर्व असून त्यांना प्रोत्साहन देणे हे मी माझे कर्तव्यच समजतो. आज सर्वांनी डॉक्टर आणि इंजिनिअर बनण्यापेक्षा चांगले शिक्षक बनणे ही सुध्दा काळाची गरज आहे.
No comments:
Post a Comment