मुंबई - महालक्ष्मी येथील रेसकोर्सवरील महापालिकेचा अडीच लाख चौ.मी.चा भूखंड वेगळा काढून थीम पार्क उभारणे शक्य नाही, असे महापालिका प्रशासनाने मंगळवारी (ता. 30) सुधार समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. सुमारे सहा लाख चौ.मी. भूखंडाची मालकी असलेले राज्य सरकारच याबाबत अंतिम निर्णय घेईल, असे पालिका प्रशासनाने मंगळवारी सुधार समितीच्या बैठकीत स्पष्ट केल्याने शिवसेनेचे थीम पार्क उभारण्याचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे.
रेसकोर्सच्या आठ लाख 55 हजार चौ.मी.च्या भूखंडावर थीम पार्क उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव 2013 मध्ये राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे; मात्र राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असा अहवाल पालिका प्रशासनाकडून सुधार समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता. त्यावर पालिकेचा दोन लाख 58 हजार चौ.मी.चा भूखंड ताब्यात घेऊन त्यावर थीम पार्क उभारावे, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी केली; मात्र अशा प्रकारे स्वतंत्रपणे विकास करणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापालिकेचा प्लॉट काढून घेतला, तर त्याचा फारसा फायदा होणार नाही. त्यामुळे पालिका आणि राज्य सरकारने एकत्रित निर्णय घ्यावा, अशी प्रशासनाची भूमिका असल्याचे उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांनी सांगितले. यात राज्य सरकारच्या मालकीचा तब्बल पाच लाख 96 हजार चौ.मी.चा भूखंड असल्याने राज्य सरकार घेईल तो निर्णय अंतिम होणार आहे.
No comments:
Post a Comment