मुंबई 23 Aug 2016: महाराष्ट्र-तेलंगणा आंतरराज्य मंडळाच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीत तुमडीहेटी, मेडिगट्टा आणि चनाखा-कोर्टा बॅरेज या तीन बॅरेजचे काम सुरू करण्यासाठी दोन्ही राज्यांदरम्यान महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या तिन्ही बॅरेजच्या कामांमुळे राज्यातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 30 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून उपसा सिंचन योजनांना बारमाही शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या महाराष्ट्र-तेलंगणा आंतर राज्य मंडळाच्या बैठकीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या तिन्ही बॅरेजेसचे बांधकाम, भूसंपादन, पुनर्वसन याबाबतचा संपूर्ण खर्च तेलंगणा राज्य करणार आहे. गोदावरी पाणी तंटा लवादानुसार असणारा पाणी हक्क, मत्स्य व्यवसाय करणे, नदीतील दळणवळण हे अधिकार महाराष्ट्राकडे राहणार आहेत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील एकही गाव, गावठाण बुडणार नाही. नदीकाठच्या गावांना पुराचा धोका नाही. हे प्रकल्प दोन्ही राज्यासाठी फायदेशीर ठरणारे असून उपसा सिंचन योजनांना बाराही महिने पाणी मिळणार आहे. या भागातील नागरीकांनी या प्रकल्पांना विरोध करु नये असे आवाहनही शेवटी त्यांनी केले.
तेलंगणा राज्याच्या तुमडीहेटी व मेडीगड्डा बॅरेजमुळे महाराष्ट् राचे पाणी वापराचे हक्क बाधित होत नाहीत. या दोन्हीबॅरेजेसच्या बांधकामांचा निर्णय दोन्ही राज् यांच्या सहमतीने आंतरराज्य मंडळा च्या बैठकीत महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून झालेला आहे. तसेच पैनगंगा नदीवरील दिग्रस बॅरेज आणि पिंपरड-परसोडा बॅरेज याबाबतचा निर्णय सर्वेक्षण आणि अन्वेषणाद्वारे अंतिम करण्यात येणार आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
के.चंद्रशेखर राव म्हणाले, गोदावरी नदीवरील या प्रकल्पाचा फायदा दोन्ही राज्यांना होणार असून हे माझे ‘ड्रिम प्रोजेक्ट’आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा हे शेजारी राज्य असून दोघांनाही प्रगतीसाठी चांगली संधी आहे. कृष्णा खोऱ्यातील पाणी वाटपाबाबत महाराष्ट्राशी कोणताही वाद नसून भविष्यात त्याबाबत असाच सकारात्मक तोडगा काढला जाईल आणि याबाबत आंध्रप्रदेशची असलेल्या वादात महाराष्ट्र आणि तेलंगणा एकजुटीने बाजू मांडतील.
No comments:
Post a Comment