मुंबई, दि. 22 Aug 2016 : उल्हासनगर महानगरपालिकेसाठी 30 सप्टेंबर, तर ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 ऑक्टोबर 2016 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल. त्यानंतर प्रभाग रचना व आरक्षणाबाबत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.
सहारिया यांनी सांगितले की, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर या महानगरपालिकांची मुदत मार्च/एप्रिल 2017 मध्ये संपत आहे. तत्पूर्वी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. महानगरपालिकांसाठी 2011 च्या लोकसंख्येच्या आधारे सदस्य संख्या निश्चित केली जाईल. त्यानंतर प्रभाग रचना करण्यात येईल. सर्व महानगरपालिकांची प्रभागरचना बहुसदस्यीय पद्धतीने केली जाईल.
राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व महानगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेस 23 सप्टेंबर 2016 पर्यंत मान्यता देण्यात येईल. त्यानंतर संबंधित तारखांना महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाबाबत सोडत काढण्यात येईल. आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत 10 ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत संबंधित महानगरपालिकेत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यावर राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत कलेले अधिकारी 4 नोव्हेंबर 2016 पर्यंत सुनावणी देतील. अंतिम प्रभाग रचना 25 नोव्हेंबर 2016 रोजी प्रसिद्ध केले जाईल, असेही सहारिया यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment