मुंबई / www.JPNnews.in
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत मुंबई सारख्या मेगासिटीचे दहाव्या क्रमांकावर असणे हे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे. शिवाय ही स्पर्धा दसऱ्या तिसऱ्या कुणीही नाही तर तुमच्याच पक्षाच्या केंद्र सरकारची असल्याने हा घरचा आहेर मिळाल्यानंतर तरी आता महापालिकेतील सत्ताधारी सुधारणार का, असा टोलाही त्यांनी लगावला.
सत्तेवर येताच युती सरकारने राज्यातील जनतेला वारेमाप आश्वासने दिली. मुंबईला स्मार्ट सिटी बनवण्याची घोषणा ही त्यापैकीच एक. मात्र आता या स्मार्ट सिटीच्या घोषणेचे चांगलेच तीन तेरा वाजले आहेत. कारण देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर हे देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत चक्क दहाव्या क्रमांकावर आहे. ही यादीही केंद्र सरकारनेच जाहीर केली अाहे. कोट्यवधींचा अर्थसंकल्प असलेले मुंबईसारखे शहर जर तुम्हाला स्वच्छ ठेवता येत नसेल , तर ते स्मार्ट बनवण्याच्या घोषणा कुठल्या आधारावर करता आहात, असा सवाल अहिर यांनी यावेळी केला.कुठल्याही शहरातील नागरिकांना महापालिकेच्या किमान सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे आता यातून काहीतरी बोध घेत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मुंबईकरांना चांगल्या सुविधा द्याव्यात,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
No comments:
Post a Comment