मराठवाड्यातील चाराछावण्या बंद करण्याचा निर्णय "रझाकारी"
मुंबई / www.JPNnews.in दि. 15 :
मराठवाड्यातील बीड , लातूर, उस्मानाबाद या तीन सर्वाधिक दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील चारा छावण्या बंद करण्याच्या शासनाचा निर्णय 'रझाकारी' निर्णय असून यामुळे जनावरे चारा-पाण्याअभावी मृत्युमुखी पडतील, शेतकऱ्यांनाही आत्महत्या करावी लागेल. शेतकरी आत्महत्यांचं पाप हे सर्वस्वी राज्य सरकारचं असेल, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली.
मराठवाड्यातील या तीन जिल्ह्यातील चारा छावण्या बंद करण्याचे पत्र शासनाने १० फेब्रुवारी रोजी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले असून त्यात चारा छावण्या बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या या निर्णयावर टिका करताना मुंडे यांनी सरकारच्या हेतूबद्दल प्रश्न उपस्थित केले. या तीन जिल्ह्यात अचानक चारा कसा उपलब्ध झाला ? चारा उपलब्ध होता तर या आधी छावण्यांना परवानगी कशी दिली ? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
मुंडे पुढे म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागातल्या जनावरांना छावण्यात चारा , पाणी मिळत होतं. त्यामुळे ही जनावर जगत होती. आता गावात परत गेल्यास तिथं चारा नाही अन् पाणीही मिळणार नाही ? सरकारला शेतकऱ्यांची जनावरे मारून टाकायची आहेत का ? अशी उद्वीग्नता त्यांनी व्यक्त केली.
'मेक इन् महाराष्ट्र'च्या झगमगाटात डोळे दिपून गेलेल्या या सरकारला राज्यात, दुष्काळ असल्याचे भान उरलेले नाही. चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
No comments:
Post a Comment