मुंबई / www.JPNnews.in
मुंबईत विनातिकीट फुकटय़ा लोकल प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी विशेष तिकीट तपासणी अभियान राबवले जात असून एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ या काळात चालविलेल्या या अभियानात मध्य रेल्वेने तब्बल १०३.९५ कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याचे समोर आले आहे.
मध्य रेल्वेने एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ दरम्यान २०.७४ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून हा दंड वसूल केला. विशेष म्हणजे मागील वर्षी केलेल्या कारवाईच्या तुलनेत या वर्षी १५.८२ टक्के अधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे दंडाच्या उत्पन्नातही २१.७४ टक्के वाढ झाली आहे.
आरक्षित तिकिटांचे अनधिकृत हस्तांतरण करणा-या दलालांविरोधात केलेल्या कारवाईत जानेवारीत ७४७ जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये ५.४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अचानक करण्यात येत असलेल्या कारवाईत अनेक विनातिकीट प्रवासी जाळ्यात सहज अडकतात. स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर किंवा पादचारी पुलांवर मुख्यत: ही विशेष कारवाई करण्यात येते. या वेळी विनातिकीट प्रवासी पळू नयेत, तसेच अनुचित प्रकार घडू नये याकरता आरपीएफचीही मदत घेतली जात असल्याचे रेल्वे अधिका-याने सांगितले.
No comments:
Post a Comment