मुंबई http://www.jpnnews.in
बेस्टचे वीजग्राहक टाटा आणि रिलायन्सकडे वळत असून त्यामुळे उपक्रमाच्या वीज विभागाचे उत्पन्न घटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट वीजग्राहकांना टिकवण्यासाठी उपाययोजना करा, अशी मागणी गुरुवारी ठरावाच्या सूचनेद्वारे कॉंग्रेसने केली. इमारतींचे बांधकाम करताना तात्पुरत्या स्वरूपात टाटाकडून वीजपुरवठा घेतला जातो; बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ग्राहक बेस्टकडे पाठ फिरवत आहेत. बेस्टपासून दूर जाणाऱ्या वीजग्राहकांची दखल घेत स्वतंत्र समिती नेमण्याचा निर्णय आज बेस्ट समितीच्या बैठकीत झाला.
ग्रॅण्ट रोड येथे एक विकसक चार हजार झोपड्या पाडून एसआरए योजना राबवत आहे. तेथे उभारल्या जाणाऱ्या दोन टॉवरसाठी टाटा पॉवरने तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी दिली आहे. बेस्टने 18 रुपये प्रतियुनिट दराने वीज देऊ केली होती; मात्र हा दर जास्त असल्यामुळे बिल्डरने टाटाकडून वीजजोडणी घेतली. परळ येथे एका इंटरनॅशनल स्कूललाही टाटाने वीजजोडणी दिली आहे.
बेस्टचे वीजग्राहक मोठ्या प्रमाणात इतर वीज कंपन्यांकडे जात असूनही प्रशासन गंभीर नाही. उपक्रमाचे वीजग्राहक टिकवण्यासाठी उपाययोजना करा, अशी मागणी कॉंग्रेसचे रवी राजा यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केली. हरकतीचा मुद्दा राखून ठेवत बेस्ट समितीने अध्यक्ष अरविंद दुधवडकर आणि उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांच्यासह पाच सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
No comments:
Post a Comment