मुंबई / प्रतिनिधी / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
जगण्याची दयनीय अवस्था आणि दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी करावी लागणारी तडजोड अशी परिस्थिती असलेल्या मुंबईमधील गोवंडी येथील १०० हून अधिक खाजगी आणि महानगरपालिका शाळांमधील ७५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग असलेल्या गोवंडी एज्युफेस्ट २०१६ चे १९ ते २१ जानेवारी २०१६ दरम्यान आयोजन करण्यात आल्याची माहिती स्थानिक नगरसेवक व समाजवादी पक्षाचे महापालिकेतील गटनेते रईस शेख यांनी दिली.
गोवंडी एज्युफेस्ट २०१६ तीन दिवस चालणार असून या तीन दिवसात शाळांमधील विद्यार्थ्यांना, गोवंडी मधील स्थानिक रहिवाश्यांना तसेच बॉडीबिल्डींग करणाऱ्या युवकांना आपली कला दाखावण्याची संधी मिळणार आहे. गोवंडी मधील पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण मोठे आहे. अश्या परिस्थितीमध्ये २० ते ३० टक्के विद्यार्थी पहिल्यांदाच आपल्या कुटुंबातून शाळेत जाणारी आहेत. अश्या विद्यार्थ्यांना या फेस्टमध्ये सहभागी करून त्यांच्या मध्ये शिक्षणाची गोडी वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गोवंडी मधील कित्तेक युवक चांगले कलाकार आहेत परंतू हे युवक गोवंडी मध्ये राहत असल्याने त्यांना चांगले प्रोत्साहन मिळू शकलेले नाही. अश्या वंचित घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवंडी एज्युफेस्टचे आयोजन केले असल्याचे शेख म्हणाले. आजचे युवक विविध व्यसनाचे शिकार झाले आहेत. अश्या युवकांना व्यसनापासून लांब ठेवण्यासाठी बॉडीबिल्डींग स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यामधून अश्या युवकांना नोकऱ्या मिळण्यास मदत केली जाणार असल्याचे शेख यांनी सांगितले.
गोवंडी एज्युफेस्टचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असून येत्या ५ वर्षात मुंबईमध्ये गोवंडीची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शेख यांनी सांगितले.गोवंडी एज्युफेस्टला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या वतीने अभिषेख मिश्रा इत्यादी मान्यवर उपस्थित राहतील अशी माहिती शेख यांनी दिली. यावेळी टाटा इंस्टीटयूटच्या सबा खान यांनी गोवंडी मधील शिक्षणाबाबतची आकडेवारी सादर करून गोवंडी एज्युफेस्ट सारखे कार्यक्रम आयोजित केल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होऊन शाळांमधील गळतीचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल असे सांगितले.