ऑनलाईन परीक्षेद्वारे ७१,८१६ उमेदवारांमधून ९४२ कर्मचा-यांची निवड
मुंबई / प्रतिनिधी -
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे संपूर्णपणे ऑनलाईन पध्दतींचा वापर करीत राबविण्यात आलेल्या 'स्मार्ट' भरती प्रक्रियेला 'इ – इंडिया' या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कर्मचारी निवड प्रक्रियेसाठी संपूर्णपणे ऑनलाईन पध्दतीचा वापर करुन राबविण्यात आलेली 'स्मार्ट' भरती प्रक्रिया ही केवळ ०७ महिन्यात यशस्वीरीत्या व पारदर्शकपणे पूर्ण करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे. याच वैशिष्टयपूर्ण बाबीची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. मुंबईतील ताज प्रेसिडेंट(विवांता) या तारांकित हॉटेलमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या 'इ – इंडिया' शिखर परिषदेच्या दिमाखदार सोहळ्यादरम्यान 'इ – इंडिया' या पुरस्काराने गौरविण्यात आल्याने महापालिकेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
एलेट्स टेक्नोमिडिया या संस्थेद्वारे प्रशासनात `इ-गव्हर्नमेंट' चा अत्यंत प्रभावी व लोकापयोगी वापर करणा-या संस्थांना सन २००५ पासून दरवर्षी `इ-इंडिया' पुरस्कारांनी गौरविण्यात येते. याच अंतर्गत या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये बृहन्मुंबई महापालिकेने राबविलेल्या `स्मार्ट' भरतीप्रक्रियेचा गौरव करण्यात आला आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उपायुक्त किरण आचरेकर यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेली 'स्मार्ट' भरती प्रक्रिया मार्च – २०१४ ते सप्टेंबर – २०१४ या दरम्यान म्हणजेच केवळ सात महिन्यात पूर्ण झाली होती. या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्यासाठी अर्ज करणे, संबंधित शुल्क भरणे, राज्यातील १४ केंद्रांवर लेखी परीक्षा व टंकलेखन चाचणी एकाच वेळी घेणे, परीक्षण करणे व अंतिम निकाल यादी जाहीर करणे आदी सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण ७१,८१६ उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता. यामधून अंतिमत: ९४२ उमेदवारांची लिपिकीय पदांसाठी निवड करण्यात आली होती. २ मार्च २०१४ :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील ९४२ लिपिकांची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात महापालिकेच्याwww.mcgm.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment