गोराई डम्पिंग ग्राउंडचा चांगला वापर करा
मुंबई / अजेयकुमार जाधव
जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 30 Dec 2015
मुंबई महानगरपालिकेचा गोराई डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्प बंद पडला आहे. या प्रकल्पाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. आज हि जागा कोणताही वापर होत नसल्याने पडून आहे. मुंबई महानगरपालिकेने या जागेचा चांगला वापर करायला हवा असा सल्ला देत स्वच्छ भारत अभियानचे सह संचालक प्रवीण प्रकाश यांनी मुंबई महानगरपालिकेचे कान उपटले. याचवेळी मुंबईमध्ये १ लाख १५ हजार शौचालय बनवण्याची गरज असून मुंबई महानगरपालिकेने डिसेंबर २०१६ पर्यंत १ लाख शौचालये बांधून मुंबई स्वच्छ ठेवावी असे प्रकाश यांनी निर्देश दिले. मुंबई महानगरपालिकेला प्रवीण प्रकाश यांनी बुधवारी भेट दिली या भेटी नंतर पत्रकार परिषदेत प्रकाश बोलत होते.
स्वच्छ भारत अभियानानुसार मुंबईमध्ये घराघरात शौचालये बनवणे गरजेचे असून घराघरात शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रत्तेकी ६५०० रुपये दिले जाणार आहेत. ज्या घराघरात शौचालय बांधले जाईल त्या ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी मुंबई महानगरपालिका २० हजार रुपये खर्च करेल. मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी ४०० कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे. या ४०० कोटी रुपयातील २०० कोटी रुपये घन कचरा व्यवस्थापन आणि ५० कोटी रुपये जन जागृती व इतर कामासाठी खर्च केले जाणार आहेत. या ४०० कोटी रुपयांमधील ८.५ कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेला अद्याप देण्यात आले आहेत. मुंबई स्वच्छ ठेवणे हि महानगरपालिका आणि मुंबईकर नागरिकांची जबाबदारी आहे. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही आपल्या सवयी बदलायला हव्यात असे प्रकाश यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या धर्तीवर मुंबई महानगर पालिकेनेही स्वच्छतादूत म्हणून नेमणूक करावी असा सल्ला प्रकाश यांनी दिला.
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत दर १५ दिवसासाठी महानगर पालिकांना कार्यक्रम देण्यात आला आहे. १५ ते ३० डिसेंबर दरम्यान स्थानिक रहिवाश्यांच्या असोसिएशन बरोबर चर्चा करण्यात आली. आता १ ते १५ जानेवारी दरम्यान रस्त्यावरील कचराकुंड्यां सुधारण्यात येतील. देशातील ज्या महानगर पालिका कचऱ्या पासून खत बनवतील अश्या महानगर पालिकांना केंद्र सरकार प्रती म्याट्रिक टन १५०० रुपये दिले जाणार आहेत. तसेच ज्या महानगरपालिकां कचऱ्यापासून वीज निर्मिती करतील अश्या महानगरपालिका हद्दीतील कंपन्यांना महानगर पालिकेकडून राज्य वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या दरात वीज खरेदी करावी लागेल असा कायदा बनवला जात असल्याचे प्रकाश म्हणाले. मुंबईकडून केंद्राच्या अपेक्षा असून मुंबईमहानगर पालिका आणि मुंबईकर नागरिकांनी स्वच्छ भारत अभियान यशस्वी करावे आसे आवाहन प्रकाश यांनी केले.
कचरा गोळा करण्यासाठी नवा कर
मुंबईमध्ये दुकानातून कचरा गोळा केला जात नाही. मुंबई महानगरपालिकेने दुकानात जाऊन कचरा गोळा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रकाश यांनी केले. दुकानात जाऊन कचरा गोळा करणे पालिकेला आपल्या आर्थिक तरतुदी प्रमाणे शक्य नसल्यास पालिकेने कचरा गोळा करण्यासाठी वेगळा कर लावावा असा सल्ला प्रकाश यांनी दिला.
मुंबईमध्ये स्वच्छता अभियानाचा सर्व्हे
भारतातील ७५ शहरांमध्ये स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सर्व्हे होणार असून १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान मुंबई मध्ये सर्व्हे होणार आहे. या सर्व्हे दरम्यान १ ते दिड लाख मुंबईकर नागरिकांना फोन द्वारे शहरातील स्वच्छते बद्दल प्रश्न विचारले जाणार आहे. केंद्रीय स्वच्छ भारत अभियानचे प्रतिनिधीही सर्व्हे करून भारतातील स्वच्छ शहराची निवड केली जाणार असल्याचे प्रकाश यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment