मुंबई / अजेयकुमार जाधव
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान असलेल्या बंगल्याची जागा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. महापौर बंगला हे सरकारी निवासस्थान असल्याने आणि बाळासाहेबांसारख्या उत्तुंग अश्या व्यक्तिमत्वाला हि जागा कमी असल्याने महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक उभारले जाऊ नये अशी मागणी मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका सभागृहात निवेदनाद्वारे केली. यावेळी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी बांद्रा येथील मातोश्री बंगलाच योग्य असल्याने मातोश्रीवरच बाळासाहेबांचे स्मारक बनवावे अशी मागणी आंबेरकर यांनी केली.
यावेळी बोलताना मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना आणि त्यांच्या बंगल्याला अनन्य साधारण महत्व आणि प्रतिष्ठा आहे. महापौर बंगल्याला ऐतिहासिक वस्तू म्हणून दर्जा आहे. अशी ऐतिहासिक दर्जा असलेली वास्तू स्मारकासाठी घेणे अयोग्य असल्याचे आंबेरकर यांनी म्हटले आहे. महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी चुकीचा पायंडा पाडला असल्याचे सांगत येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला व अन्य शासकीय निवासस्थाने देखील स्मारकाच्या नावाने दिली जातील अशी शक्यता आंबेरकर यांनी यावेळी व्यक्त केली. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी बाळासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वाचे स्मारक बनवायचे असल्यास महापौर निवासस्थानापेक्षा मोठ्या जागेत बनवावे अशी मागणी केली.
काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी महापौरांचे निवासस्थान भायखळा येथील राणीबागेत हलवल्यास बुधवारी राणीबाग बंद ठेवली जात असल्याने महापौर बुधवारी लोकांना मिळणार नाहीत का ? महापौरांना भेटायला तिकीट काढून भेटायला लागणार का असे उपरोधिक प्रश्न उपस्थित केले. पालिकेची जागा देण्याचा मुख्यमंत्र्याना अधिकार नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची जाग स्मारकाला का दिली नाही असा प्रश्न छेडा यांनी उपस्थित केला. भाजपाने टाकलेल्या गुगलीत शिवसेनेची विकेट पडल्याचेही छेडा यांनी म्हटले. समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी मातोश्री हि ठाकरे घराण्याची स्वतःची संपत्ती असल्याने यी संपत्ती मध्ये बाळासाहेबांचे स्मारक उभारावे अशी मागणी करत महापौर बंगला हि महापौरांची शान असल्याने महापौरांची शानकमी करू नये असे रईस शेख म्हणाले.
यावर बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी बाळासाहेबांचे स्मारक उभारायचे असल्यास वाद न करता उभारावे असे सांगितले. केंद्र सरकारने सरकारी बंगल्यात कोणाचेही स्मारक उभारू नये असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आधार घेवून कोणी न्यायालयात गेल्यास स्मारक वादात अडकू शकते. शिवसनेचे नेते असलेल्या रविंद्र वायकर यांच्या संस्थेला ५ एकर जागा, सेनेचे खासदार असलेल्या राहुल शेवाळे यांच्या आम्युजमेंट पार्कला हेक्टरमध्ये जागा मिळणार आहे असे असताना बाळासाहेबांच्या स्मारकाला जागा का मिळत नाही असा प्रश्न संदिप देशपांडे यांनी उपस्थित करत महापौर बंगला लाटण्याचा हा प्रकार असल्याचे देशपांडे यांनी म्हटले. तर याबाबत बोलताना सेना भाजपाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक कसे योग्य आहे आहे अशी बाजू मांडली.
चर्चे दरम्यान सेनेच्या नगरसेवकाला हार्टअट्याक
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत चर्चा होत असताना सेनेचे स्वीकृत असलेल्या नगरसेवक आणि पक्ष प्रतोद मिरज शेख सभागृहात चर्चा करताना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना सभागृहातच हार्टअट्याक आल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.
No comments:
Post a Comment