मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई शहरातील पर्यावरणाकडे सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. रेल्वे आणि बसची भाडेवाढ झाली आहे. महागाईमध्ये जनता होरपळून निघाली असताना घाटकोपर येथील भिमाशंकर परिसर विकास प्रतिष्ठान या संस्थेने पर्यावरण रक्षणासाठी एक पाउल पुढे टाकले आहे. मुंबई महानगरपालिकेची परवानगी मिळताच एन विभागात संस्थेच्या वतीने २४ ठिकाणी सायकल परिवहन सेवा सुरु केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किसनराव गोपाळे यांनी दिली.
मुंबई घाटकोपर येथे भिमाशंकर परिसर विकास प्रतिष्ठान व आनंदऋतू फौंडेशन, ठाणेचे किमंतु ओंबळे व संतोष सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने हि योजना राबवली जाणार आहे. घाटकोपर मधील २४ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. घाटकोपर स्टेशन ते पश्चिमेकडे भटवाडी, बर्वे नगर, असल्फा, परेरा वाडी, साकीनाका, गोळीबार रोड, माणेकलाल, जगदुषा नगर, अमृत नगर, आर सिटी मॉल, श्रेयस, पूर्वेकडील कुकरेजा नगर, पोलिस ग्राउंड, पंत नगर, बस डेपो, टिळक नगर, राजा वाडी, रमाबाई नगर, छेडा नगर, गरोडिया नगर, सहकार सिनेमा या ठिकाणी फक्त ५ रुपयात चालवली जाणार आहे.
एन विभागात सायकल परिवहन सेवा सुरु करण्यासाठी संस्थेने मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ ६ चे उपायुक्त सुहास करवंदे यांना निवेदन दिले होते. पालिका उपायुक्त यांच्या भेटी दरम्यान सायकल परिवहन सेवा सुरु करण्यास पालिका सकारात्मक असल्याचे किसनराव गोपाळे यांनी सांगितले. सायकल परिवहन सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाश्यांकडून २५० रुपये नोंदणी शुल्क घेतले जाणार आहे. प्रत्तेक फेरीला फक्त ५ रुपये आकारले जाणार असल्याने मुंबईच्या पर्यावरण रक्षणाबरोबरच नागरिकांना सुदृढ असे आयुष्य लाभणार असल्याचे गोपाळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment