मुंबई, दि. 24 : अजेयकुमार जाधव
राज्यातील दुष्काळग्रस्त जनता मदतीसाठी टाहो फोडत असताना, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना दिल्लीत वापरण्यासाठी मर्सिडीस बेन्झ आणि टोयाटो फार्च्युनर या दोन बुलेटप्रुफ गाड्या तब्बल दीड कोटी रुपये खर्च करुन खरेदी करण्याचा राज्य शासनाचा निर्णय संवेदनशून्य, तसंच दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमांवर मीठ चोळणारा आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
शासनाच्या गाड्याखरेदी निर्णयावर मुंडे म्हणाले की, राज्यपाल आणि मुख्यमंत्री महोदयांच्या पदाचा सन्मान राखला जावा तसेच त्यांच्या सुरक्षेशी तडजोड केली जावू नये, यासंदर्भात राज्यातील जनतेच्या आणि आमच्या मनात कुठलीही शंका नाही. परंतु राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यापूर्वीची व्यवस्था यापुढेही काही काळ कायम ठेवता आली असती.
भीषण दुष्काळामुळे जनता संकटात आहे, गणेवश न मिळाल्यानं, एसटी बससाठी पैसे नसल्यानं विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. एकीकडे राज्यावर कर्जाचा बोझा आहे म्हणून ओरड करायची, विकासयोजनांना कात्री लावायची, परंतु ज्यात दिल्लीत आपण एक-दोन दिवसांसाठी जातो त्यासाठी दीड कोटी रुपयांची वाहनं घ्यायची, हा निर्णय प्रशासकीय अपरिपक्वता दाखवतो, असेही मुंडे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी शपथ घेताना 'झेड' सुरक्षा व्यवस्था नाकारली होती, आता मात्र कोट्यवधींच्या गाड्या खेरदी करण्यात येत आहे. याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांचं ते वागणं हे नाटकं होतं, खरं तर हे संपूर्ण सरकार नाटक आहे, हे जनतेच्या आता लक्षात आलं आहे, असेही मुंडे म्हणाले.
No comments:
Post a Comment