मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात अद्यापही स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही. स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रकार वाढत असल्याचे वास्तव मुंबई मध्ये पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांवरून निदर्शनास येत आहे. हुंड्यासाठी आजही विवाहितेचा छळ होत असून मुंबईत गेल्या १० महिन्यात यासंबंधी तब्बल ५०० गुन्हे दाखल आहेत.
हुंडाविरोधी दिन गुरुवारी साजरा केला जात असताना त्याबाबत खऱ्या अर्थाने जागृती आणण्याची गरज आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीपासून हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाप्रकरणी ५०० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये एकीची हत्या झाली आहे तर अत्याचाराला कंटाळून ६ जणीनी आत्महत्या केली आहे. ३१ जणींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. संविधान दिनीच हुंडा विरोधी दिन साजरा करण्याबाबत राज्यभर संस्था एकवटल्या होत्या. यामध्ये नोंद असलेल्या स्त्री-पुरुष समानतेला कागदावरच न ठेवता नागरीकांच्या मनात रुजवणे गरजेचे झाले आहे. त्यानुसार २००६ साली याबाबतचे परिपत्रक शासनाकडून जाहीर करण्यात आले. आणि तेव्हापासून हुंडा विरोधी दिन साजरा करण्यात येतो.मात्र याबाबत पुरेशी जनजागृती न झाल्यामुळे हा दिवस त्या परिपत्रकापूरतीच मर्यादित राहिल्या असल्याची खंत हुंडा विरोधी चळवळीच्या महासचिव आशा कुलकर्णी यांनी‘ लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
No comments:
Post a Comment