ठाण्यातील प्रसिध्द संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यात येणारा दहीहंडी उत्सव यावर्षीपासून कायमचा बंद करण्याचा निर्णय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. मात्र, उत्सव सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन दिवसात मुंबई परिसरात दहीहंडी फोडण्याचा सराव करताना सुरक्षेची काळजी न घेतल्याने दोन बाल गोविंदाचा जखमी होऊन मृत्यू झाला. तसेच बाल हक्क आयोगानेही दहीहंडी उत्सवात सुरक्षेच्या कारणस्तव सहा वर्षांखालील बाल गोविंदांना सहभागी न करण्याचा आदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे आमदार सरनाईक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. दहीहंडीचा उत्सव सुरूच राहणार असून, या माध्यमातून जमा होणारा निधी चांगल्या कामासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी पासून साध्या पध्दतीने दहीहंडी साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.